Friday, February 3, 2017

अळिवाचे लाडू 


    नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!!
आजची रेसिपी आहे अळीव चे लाडू. अळीव हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने युक्त  असतात. लहान मुलांसाठी अळीव अतिशय पौष्टिक असतात.तसेच आजारी असेल तर अळिवाची खीर दिली जाते. अळीव  चे लाडू थंडीच्या दिवसात अतिशय उपयुक्त असतात. कंबरदुखीवर देखील अळिवाचे लाडू खाण फायदेशीर आहे. बाळंतपणात अळीव लाडू खाल्ले जातात. आळीव पाण्यात भिजवले असता ते पाणी शोषून सब्जाप्रमाणे फुलून येतात. अळिवाचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य आहे:

साहित्य:
१ छोटी वाटी अळीव                                 
१ नारळ
१/२  वाटी दुधाची साय(क्रीम)
साखर अथवा गूळ


कृती:
१.नारळ फोडून घ्यावा. नारळाच्या पाण्यात अळीव  भिजवावा. कमीतकमी आळिवाच्या दुप्पट पाणी असावे. नारळाचे पाणी नसल्यास सध्या पाण्यात अळीव भिजवावा.
२. अळीव १५ ते २० मिनिटे भिजू द्यावेत. १५ मिनिटांनंतर अळीव  छान फुलून येतील. भिजून ते दुप्पट होतील.
३. नारळ खोवून घ्यावा. नाहीतर नारळाचे काप करून तो मिक्सरमध्ये पाणी न घालता फिरवावा. यामुळे नारळ खोवल्याप्रमाणे बारीक होईल. भिजलेल्या आळिवाच्या दुप्पट नारळ घ्यावा.

४. आता भांड्यात भिजवलेले आळीव, आळिवाच्या दुप्पट नारळाचा कीस(चव) आणि तिप्पट साखर घालून मिक्स करा. यात १ वाटी दुधाची साय घालून परत मिक्स करा.
५. कढईत सर्व मिश्रण घालून माध्यम आचेवर साखर विरघळेपर्यंत परतत राहा.साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता.यात साय घातल्यामुळे तूप घायची गरज नाही. साय नसेल तर त्याऐवजी  दूध घालू शकता.
६.साखर पूर्णपणे विरघळली की अजून २ मिनिटे परत. आळीव पारदर्शक झाला की गॅस बंद करा.

७.मिश्रण कोमट झाले की माध्यम आकाराचे लाडू वळा.हे लाडू २-३ दिवस फ्रिजशिवाय राहतात, नंतर मात्र ते फ्रिज मध्ये ठेवावेत. लाडू २ आठवडे फ्रिज मध्ये चांगले राहतात.
 
संपूर्ण कृतीचा video :

Monday, January 30, 2017

रव्याचे आप्पे


    नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. रोज-रोज नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रश्न कधीनाकधी सगळ्यांना  पडतोच. पोहे-उपीट हे नेहमीचे झटपट होणारे पदार्थ सोडले तर इडली-डोसा अश्या पदार्थाना १ दिवस आधी पूर्वतयारी लागते. त्यामुळे आयत्या वेळी झटपट नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न असतोच. त्यामुळे आजची रेसिपी आहे करायला झटपट आणि सोप्पे रव्याचे आप्पे. रव्याचे आप्पे करण्यासाठी फार काही पूर्वतयारीची गरज नाही. घरी पाहुणे किंवा मित्रमंडळी आली तरीदेखील करायला हा पदार्थ सोप्पा आणि सुटसुटीत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलं देखील आप्पे आवडीने खातात. यासाठी लागणार साहित्य देखील नेहमी घरात उपलब्ध असत.
साहित्य(२ जणांसाठी )
जाड रवा (२ मोठी वाटी/कप)           
दही(१ वाटी/कप )
कांदा १                                                                 
टोमॅटो १
कोथिंबीर
खाण्याचा सोडा

चटणीसाठी :      
डाळ
ओला नारळ (ऐच्छिक)
हिरवी मिरची
आलं-कोथिंबीर
लिंबू

कृती:
१. १ कप दह्यामध्ये २ कप पाणी घालून, घुसळून ताक बनवा. इथे शक्यतो आंबट दही वापरावे.
२. जाड रव्यामध्ये हे ताक घालून रवा भिजवावा. गरज पडल्यास पाणी घालावे. हे पीठ डोश्याच्या पिठाप्रमाणे सैलसर असावे.
३. २० मिनिटे हे पीठ भिजू द्यावे. खूप जास्त वेळ हे पीठ भिजवायची गरज नाही.
४. पीठ भिजेपर्यन्त मधल्या वेळेत कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
५. तसेच आप्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवू शकता. चटणीसाठी थोडं डाळ, थोडा ओला नारळाचे काप,कोथिंबीर, हिरवी मिरची,जिरे,आलं,मीठ आणि थोडं पाणी हे साहित्य मिक्सर च्या लहान भांड्यात घालून बारीक वाटून घ्या. यात आंबटपणासाठी लिंबू पिळा. आवडीप्रमाणे तुम्ही इतर कुठलीही चटणी बनवू शकता.
६. २० मिनिटानंतर राव भिजून पीठ घट्ट होईल, यात थोडे पाणी घालून इडली च्या पिठाप्रमाणे सैलसर करा. यात चालेल कांदा,टोमॅटो व कोथिंबीर घाला.चवीपुरते मीठ घालून, सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.

७. आप्पेपात्र गरम करायला ठेवा. पूर्णपणे गरम झाल्यावर प्रत्येक साच्यात थोडे तेल सोडा.थोडे पीठ बाउल मध्ये घेऊन यात 1tsp(टीस्पून) खाण्याचा सोडा घालून व्यस्थित मिक्स करा.
८. चमच्याने हे पीठ आप्पेपात्रात सोडा. झाकण घालून आप्पे मध्यम आचेवर  ३-4 मिनिटे शिजू द्या.
९.आप्पे चॅन फुलून आल्यावर ते दुसऱ्या बाजूने पलटा.  दुसरीबाजूने देखील २-३ मिनिटे झाकण न घालता शेकून घ्या.
१०. याप्रमाणे प्रत्येकवेळेस बाउल मध्ये थोडे-थोडे पीठ सोडा घालून बनवा. सोडा आप्पे करायच्यावेळी घातल्याने आप्पे छान फुलतील.
११. जास्त जणांसाठी आप्पे करायचे असल्यास, आप्पे आधी करू शकता. खाण्याच्यावेळी आप्पेपात्रात गरम करून सर्व करू शकता.
१२. अश्याप्रकारे गरम-गरम आप्पे चटणीसोबत सर्व्ह करा.
संपूर्ण कृतीचा video :



Friday, January 27, 2017

 गव्हाची खीर


    नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये! मराठी खाद्यसंस्कृतीत जे पारंपरिक गोडाचे पदार्थ आहे त्यांपैकी एक पदार्थ म्हणजे गव्हाची खीर. सणांमध्ये विशेषकरून हनुमान जयंतीला अथवा शुभककार्यात गव्हाच्या खिरीला मनाचे स्थान आहे.पूर्वी लग्नसमारंभात किंवा कुठल्याही मोठ्या समारंभात गव्हाची खीर केली जायची.चुलीवर रात्रभर शिजवून केल्या जाणाऱ्या गव्हाच्या खीरीची चव रेंगाळत राहायची. आज विविध  पदार्थांच्या रेलचेलीत गव्हाची खीर तितकीशी केली जात नाही. 

गव्हाच्या खिरीसाठी खपली गहू म्हणजेच जोड गहू वापरला जातो.हा गहू नेहमीच्या गव्हापेक्षा लालसर रंगाचा असतो. तो चवीला थोडा गोडसर असल्यामुळे खिरीसाठी वापरला जातो. खपली गव्हाला पाणी लावून, तो जात्यावर दळून त्याची साल काढून तो खिरीसाठी वापरला जात असे. आता गिरणीत हे गहू सडले(पॉलिश केले) जातात.बाजारात हे गहू खिरीचे गहू म्हणून मिळतात.खपली गव्हात फायबर चे प्रमाण अधिक असते त्यामुळे ते अतिशय पौष्टिक असतात.
 साहित्य :
  १ मोठी वाटी खिरीचे गहू
  गूळ                                            
 ओल्या नारळाचे काप
आलं अथवा सुंठ
खसखस,बडीशेप,वेलदोडे

कृती:
१. कुकर मध्ये पाणी उकळण्यास ठेवा, पाणी उकळायला लागले  की त्यात धुतलेले गहू टाका.
गहू २० मिनिटे शिजू  द्यावेत. उकळताना गव्हातील पाणी लवकर आटते, त्यामुळे वर झाकण ठेवून त्यात पाणी ठेवावे. हे पाणी कोमट झाले कि ते गव्हात घालत राहावे.
२. अशा प्रकारे २० मिनिटानंतर गहू छान फुलून येतील.मग कुकरचे झाकण लावून मंद आचेवर ६ ते ७ शिट्ट्या घ्याव्यात.

३. मधल्या वेळेत गहू शिजेपर्यंत १ चमचा खसखस आणि १ चमचा बडीशेप भाजून घ्यावी. ३-४ सोललेले वेलदोडे, भाजलेली खसखस-बडीशेप मिक्सर मधून काढावी. यात १ इंच आले टाकून पुन्हा बारीक वाटावे. गहू पचायला जड असतात. बडीशेप आणि आल्यामुळे पचनास मदत होते. आल्या ऐवजी सुंठ देखील वापरू शकता.
४. कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यावर गहू शिजले आहेत का नाही ते चेक करा. गहू भाताच्या शीताप्रमाणे पूर्णपणे शिजला पाहिजे. शिजला नसेल तर थोडे पाणी घालून परत २-३ शिट्ट्या घ्या. त्याचप्रमाणे गहू शिजल्यावर पाणी आटून कोरडा झाला असेल तर त्यात थोडे उकळते पाणी घालू शकता. रवीने गहू वरण घोटतो त्याप्रमाणे घोटून घ्या.
५. आता कुकरचा गॅस पुन्हा चालू करा. खिरीत आवडीप्रमाणे गूळ, ओल्या नारळाचे काप आणि वर तयार केलेला मसाला टाका. सर्व साहित्य नीट मिक्स करा. यात अगदी चिमूटभर मीठ टाका. गूळ पूर्णपणे विरघळला आणि उकळी आली की गॅस बंद करा.

६. गरम-गरम खिरीवर दूध आणि तूप घालून खीर सर्व्ह करा. खीर जास्तवेळ मुरल्यावर आणखी छान लागते.


यात तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटस देखील घालू शकता.
Complete Video:

Thursday, January 26, 2017

सोलकढी  



नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. कोकणची खाद्यसंस्कृती म्हटली  कि सोलकढीची आठवण  झाल्याशिवाय राहत नाही. कोकणात फिरायला गेलेला माणूस, तो शाहकारी असो अथवा मांसाहारी, तो सोलकढीची चव घेतल्याशिवाय परत येत नाही. मांसाहारी जेवणानंतर  अॅसिडिटी होऊ नये व पचन चांगले व्हावे यासाठी सोलकढी उपयुक्त आहे. 
कोकम आणि नारळाच्या दुधापासून सोलकढी बनवली जाते. त्यामुळे तीला  कोकमकढी असेही म्हटले जाते. सोलकढी साठी नारळ घेताना खूप जुना नारळ वापरू  नये.नारळ कोवळा असावा. तसेच फ्रिज मध्ये ठेवलेला नारळ वापरू नये. सोलकढी बनवताना कोकम भिजवून त्याचा गर वापरला जातो. पण आता सगळीकडदे कोकमाचा अर्क म्हणजेच कोकम आगळ मिळत असल्यामुळे तो वापरला जातो.  त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी यात लसूण घातला जातो, पण थोड्यावेळानंतर कच्च्या लसणाचा वास येतो व सोलकढी जास्त वेळ ठेवता नाही. त्यामुळे याठिकाणी मी फक्त  आलं घालून सोलकढी केली आहे. सोलकढीला चॅन गुलाबी रंग यावा म्हणून मी याठिकाणी बीट चा वापर केला आहे. याने सोलकढी ला रंग पण छान येतो आणि शिवाय रंग नैसर्गीकही आहे.
  
साहित्य:              
 १ नारळ
२-३ tsp कोकम आगळ
आलं
जिरे
कोथिंबीर
हिरवी मिरची
बीटाचा छोटा तुकडा
चवीपुरते मीठ आणि साखर

कृती:
१. नारळ फोडून , खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्या.
२. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात नारळाचे काप, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा आल्याचा तुकडा,बीटाचा तुकडा टाका. प्रथम अर्धा ग्लास पाणी टाकून सर्व बारीक वाटून घ्यावे.
३. पुन्हा यात १ ग्लास पाणी घालून मिक्सरवर वाटावे.
४. बारीक चाळणीने गाळून, नारळाचे दूध काढून घ्यावे.
५. नारळाच्या चोथ्यामध्ये थोडे(१ ग्लास) पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे.
६.नारळाचे हे दूध खूप पातळ अथवा खूप घट्ट नसावे.




७.आता यात २ मोट्ठे चमचे कोकम आगळ आणि चवीपुरते मीठ टाकावे. सोलकढी व्यवस्थित हलवून घ्यावी.चव बघून कोकम आगळ कमी-जास्त करावा.
८. शेवटी १ छोटा चमचा साखर, मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सोलकढी मिक्स करावी.
९. फ्रिज मध्ये १५ मिनिटे ठेवून सोलकढी सर्व्ह करावी. १ नारळापासून ४ ते ५ छोटे ग्लास सोलकढी होते.




Monday, January 23, 2017

मटार पुलाव

 

नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. थंडीचे दिवस आले कि बाजारात ताजे मटार उपलब्ध होतात. हिरवेगार ताजे मटार वापरून विविध पदार्थ केले जातात. तेव्हा एकदातरी हा मटार पुलाव झालाच पाहिजे.

साहित्य :
१ कप अख्खा बासमती तांदूळ
१ वाटी मटारचे दाणे
१ कांदा
१ टोमॅटो
थोडी पुदिन्याची पाने
१ चमचा आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट


खडा/ अख्खा गरम मसाला:
१ tsp जिरे                                    

४-५ लवंग
दालचिनी
काली मिरी
तमालपत्र


 

कृती: 
१. प्रथम तांदूळ २० मिनिटे भिजून निथळून घ्यावा, यामुळे भात  छान  फुलून येतो.
२. कांदा व टोमॅटो पातळ उभे चिरून घ्या. मिरचीचे तुकडे करा व पुदिना बारीक चिरून घ्या.
३.  कुकर मध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला टाका.
४.  यात चिरलेला कांदा टाकून तो गुलाबीसर रंगावर परतून घ्या.
५. आता यात मिरची व मटार चे दाणे टाकून परतून घ्या.
६. शेवटी टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट व पुदिन्याची पाने टाकून हलवून घ्या.

 


७. याठिकाणी भाज्या खूप जास्त वेळ न शिजू देता फक्त गडद रंगाच्या होईपर्यंत तेलात परताव्यात.
८. यात निथळलेला तांदूळ टाकून २ मिनिटे परतावे.
९. १ कप तांदळासाठी दीड कप गरम पाणी टाकावे.
१०. पाण्याला उकळी आल्यावर कुकरचे झाकण लावून २ शिट्ट्या घ्याव्यात.
११. कुकरचे झाकण उघडून वाफ पूर्णपणे जाऊ द्यावी.शेवटी वरून  तळलेले काजू व चरलेली कोथिंबीर घालून पुलाव वाढावा.